Together …. We Can!

Only registered association of Teaching and Non Teaching employees of Technical / Pharmacy / MBA institutes in the state of Maharashtra

About Us

विनाअनुदानीत तंत्रशिक्षण संस्थांमधील कर्मचान्यांना समजामध्ये सन्मानाने जगता यावे, हया तंत्रशिक्षण संस्थांची दर्जात्मक व गुणात्मक वाढ व्हावी व काही ठिकाणी विद्यार्थी- पालकांच्या हतबलतेचा गैरफायदा घेऊन त्यांची होणारी लूट थांबावी ह्या करता टिचर्स असोसिएशन फॉर नॉन एडेड पॉलिटेक्नीक्स (टॅफनॅप) ही संघटना संपूर्ण महाराष्ट्रभर कार्यरत आहे. टिचर्स असोसिएशन फॉर नॉन एडेड पॉलिटेक्निक्स (टॅफनॅप) ही संघटना संपुर्ण महाराष्ट्रातील विनाअनुदानित तंत्रशिक्षण संस्थांमधील प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधीत्व करणारी एकमात्र नोंदणीकृत संघटना आहे. विनाअनुदानित तंत्रशिक्षण संस्थांमधील अनेक गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी टॅफनॅपने आजपर्यंत आंदोलन, निदर्शने व न्यायालयीन मार्गाने सातत्याने लढा दिलेला आहे. अल्पावधितच संगमनेर, अहमदनगर, चांदवड, फैजपुर, धुळे, जळगाव, सांगली, सातारा, पुणे, मुंबई, मालेगाव, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, औरंगाबाद, यवतमाळ, अकोला, अमरावती, सोलापूर, साखराळे, इचलकरंजी व महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कधी सामोपचाराने, कधी शांततापूर्ण आंदोलनाच्या मार्गाने तर कधी न्यायालयीन लढा देऊन टॅफनॅपने विनाअनुदानित तंत्रशिक्षण संस्थांमधील कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यामध्ये स्पृहणीय यश मिळवले आहे.

Read More

News and Announcement

सोमवार दि. ३ मार्च २०१४ रोजी तंत्रशिक्षण सहसंचालक कार्यालय, पुणे विभाग पुणे यांच्या कार्यालयासमोर टॅफनॅपतर्फे विविध मागण्यांकरीता आयोजित धरणे आंदोलनामध्ये सहभागी होवून तत्कालीन पदवीधर आमदार मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी टॅफनॅपच्या वतीने तंत्रशिक्षण सहसंचालकांना निवेदन सादर केले व त्यांनंतर टॅफनॅपच्या मागण्यांचा पाठपुरावा देखील केला. त्या वेळी विरोधी पक्षात असणारे दादा आज उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आहेत.

शुल्क नियामक प्राधिकरणाचे कामकाज भ्रष्टाचारमुक्त व पारदर्शक पद्धतीने होण्याकरीता शासनाचे लक्ष वेधण्यासाठी टॅफनॅपतर्फे आझाद मैदान, मुंबई येथे गुरुवार दि. १३ मार्च २०२५ रोजी एक दिवसाचे धरणे आंदोलन आयोजित केले आहे. ह्या प्रश्नी वैयक्तिक लक्ष घालून मा. नामदार चंद्रकांतदादानी शुल्क नियामक प्राधिकरणाचे कामकाज भ्रष्टाचारमुक्त व पारदर्शक पद्धतीने होण्याकरीता ठोस कारवाई करावी ही विनंती.

चलो आझाद मैदान २०२५ – सूचना.

चलो आझाद मैदान – धरणे आंदोलन कशासाठी

महात्मा गांधी मिशनविरोधात कोर्टाचा निर्णय: कर्मचाऱ्यांना ६व्या व ७व्या वेतन आयोगाचे लाभ मिळणार

औरंगाबाद: बॉम्बे हायकोर्टाच्या औरंगाबाद बेंचने महात्मा गांधी मिशन (एमजीएम) संस्थेविरुद्ध ऐतिहासिक निर्णय दिला आहे. भारतीय कामगार सेनेच्या कर्मचाऱ्यांनी संस्थेकडून ६व्या व ७व्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करून पगारवाढ आणि salary arrears देयक मिळवण्यासाठी दाखल केलेल्या याचिकेवर कोर्टाने त्यांना यश मिळवून दिले आहे. न्यायमूर्ती एस.जी. मेहरे आणि शैलेश पी. ब्रह्मे यांनी संस्थेला चार महिन्यांच्या आत सर्व कर्मचाऱ्यांना, सेवानिवृत्तांसह, वाढीचा पगार आणि salary arrears देण्याचा आदेश दिला आहे.

याचिकेत म्हटल्याप्रमाणे, एमजीएमने अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीई) आणि राज्य शासनाच्या निर्देशांनुसार वेतन आयोगाच्या शिफारशी लागू केल्या नव्हत्या. संस्थेने आर्थिक संकटाचा हवाला देऊन पगारवाढ टाळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु कोर्टाने हे तर्क नाकारत म्हटले, “शैक्षणिक संस्था व्यावसायिक उद्योग नसून समाजहिताचे कार्य करतात. सेवा दिल्याबद्दल कर्मचाऱ्यांना योग्य वेतन नाकारणे अन्याय्य आहे.”

या निर्णयात २०१८ आणि २०१९ मध्ये दाखल झालेल्या दोन्ही याचिकांना समर्थन देण्यात आले आहे. कोर्टाने संस्थेच्या “कॉलेज बंद करू” या धमक्यांना दखल न देता कर्मचाऱ्यांचे हक्क प्राधान्य दिले आहेत. याआधी, ६व्या वेतन आयोगाच्या बक्केसाठीही कर्मचाऱ्यांना कोर्टात जावे लागले होते.

निर्णयानंतर संस्थेने निलंबनाची मागणी केली होती, पण कोर्टाने तीही फेटाळली. न्यायाधीशांनी स्पष्ट केले, “कर्मचाऱ्यांना आठ वर्षे वाट पाहायला लावणे न्याय्य नाही. संस्थेने आपल्या आर्थिक व्यवस्थापनाचा पुनर्विचार करावा.”

हा निर्णय खासगी शैक्षणिक संस्थांमधील कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी महत्त्वाचा पायंडा ठरू शकतो.

अविनाश… अविनाश भुतडा. चांदवडच्या नेमिनगर येथील फार्मसी कॉलेजमधील प्राध्यापक.

१९९५ ला टॅफनॅपची कोल्हापूर येथे स्थापना झाली. त्यानंतर पुढच्या दोनच वर्षात विळदघाट, अहमदनगर, संगमनेर, मालेगाव आणि त्यानंतर चांदवड येथील आंदोलनांमुळे टॅफनॅपचा प्रचार आणि प्रसार फार मोठ्या प्रमाणात झाला. त्यावेळी आजच्या सारखा सोशल मेडिया नव्हता पण काही तत्व आणि मूल्यांवर श्रध्दा ठेवून झोकून देवून तळमळीने काम करणारे कार्यकर्ते होते. अविनाश हा त्यापैकी एक बिनीचा शिलेदार.

अविनाशवर तरुणपणात संस्कार झाले ते राष्ट्र सेवादलाचे. सेवादलाच्या संस्कारात वाढलेला असल्यामुळे अविनाशची भाषा अतिशय सौम्य, संयमित पण तितकीच ठाम आणि ठोस. मला आठवतंय , चांदवडच्या आंदोलनामध्ये एक वेळ अशी आली होती की मॅनेजमेंटच्या बाजूने बंदुका काढून आम्हा सर्व आंदोलकांना संपवायची भाषा सुरू झाली होती. त्यावेळचे चांदवड युनिटचे अध्यक्ष भोसले सर यानीही त्यांच्याकडची बंदूक बाहेर काढली होती. परिस्थिति खूप स्फोटक होती. पण हे सर्व प्रकरण अविनाशने अत्यंत संयमाने हाताळले आणि विद्यार्थी-पालकांशी सतत संवाद साधून शांततेच्या मार्गाने हे आंदोलन यशस्वी करून दाखवले. टॅफनॅपचे मार्गदर्शक प्रा. अरुण दीक्षित, प्रा. पतके सर, प्रा. बोरसे, प्रा. बच्छाव व नाशिकच्या टॅफनॅप सदस्यांचा ह्या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग होता. चांदवडच्या यशस्वी आंदोलनानंतर अविनाशच्या मार्गदर्शनाखाली टॅफनॅपचा विस्तार पुढे धुळे, जळगाव, फैजपूर, नाशिक आणि पुढे संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात झाला.

उद्योजकता ही अविनाशच्या रक्तात जणू भिनलेलीच. खूप पूर्वी म्हणजे १९९७-९८ पासूनच थंडीच्या दिवसांत कोल्ड क्रीम बनवून त्याच्या डब्या भरून गावोगाव स्वत: फिरून विक्री करायचा व्यवसाय अविनाशने सुरू केला. बघता बघता अनेक प्रकारच्या नवीन नवीन कॉस्मेटिक प्रॉडकडसच्या सहाय्याने अविनाशच्या ह्या व्यवसायाने एक खूप मोठा टप्पा पार केला. व्यवसाय करीत असताना अविनाशने कधी त्याच्या शिक्षकाच्या कर्तव्याशी तडजोड केली नाही हे ही तितकेच महत्वाचे.

तसे पाहता वैयक्तिक कुठल्याही समस्या नसतानाही आज ३० वर्षांनंतरही अविनाशचे टॅफनॅप व टॅफनॅपच्या कार्यकर्त्यांवरचे प्रेम तसूभरही कमी झालेले नाही. २०२३ मध्ये आम्ही महाराष्ट्र दौरा केला. आम्ही नाशिकला गेलो तेव्हा दुसऱ्या दिवशी एक मोठ्या यात्रेसाठी प्रस्थान करायचे असूनही आदल्या दिवशी रात्रीच अविनाश आम्हाला भेटायला आला. त्यावेळची अविनाश, फैयाज अली सर, परदेशी, शेवाळे ह्या टॅफनॅपच्या फौंडर मेंबर्सची भेट अविस्मरणीय ठरली. पुनः एकदा नाशिकला आम्ही एक मेळाव्याला गेलो होतो, तेव्हा आमची बस सुटण्याच्या वेळेस अविनाश आणि वैनीसाहेब मला आणि ढवळे सरना आवर्जून जेवणाचा डबा घेवून आले. असे निर्व्याज प्रेम आता बघायला मिळत नाही. आजकाल बऱ्याच कार्यकर्त्यांचे प्रेम हे आमच्या केसचे काय झाले किंवा काय होणार हे विचारण्यापूरतेच असते असे प्रत्कर्षाने जाणवते आणि त्यामुळेच अविनाशचे वेगळेपण मनास भावते… कालाय तस्मे नम: .. दुसरे काय.

२८ फेब्रुवारीला नियत वयोमानानुसार अविनाश ३४ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाला. एकाच संस्थेमध्ये ३४ वर्षे सेवा बजावणे आणि तेथून सन्मानाने निवृत्त होणे ही सुद्धा आजकाल एक दुर्मिळच गोष्ट आहे. सेवानिवृत्ती निमित्य अविनाशने आज नाशिक येथे आप्त स्वकीयांसाठी छोटासा कार्यक्रम ठेवला आहे. त्याच्या निमंत्रणसाठी अविनाशचा काल मला फोन आला होता आणि माझ्या मनासमोरून अविनाशचा हा जीवनपट झर्रकन चमकून गेला.

भौतिक अर्थाने अविनाशने उत्तम संसार केला. मुलगा सीए झाला, मुलगी लग्नानंतर परदेशात स्थायिक झाली. अविनाशच्या सांसारिक जबाबदाऱ्या आता तशा कमी झाल्या. काल अविनाशचा फोन आल्यावर मी अविनाशला सहजच विचारले आता सेवानिवृत्तीनंतर पुढे काय; आणि मला अपेक्षित असलेलेच उत्तर मला अविनाशने दिले की आता एखाद्या सेवाभावी संस्थेबरोबर मी काम करेन आणि माझ्यातला कार्यकर्ता जिवंत ठेवेन. टॅफनॅपच्या ह्या पिढीतील सदस्यांना टॅफनॅपच्या पायाच्या दगडांची ओळख व्हावी म्हणून आज मी हा लेखनप्रपंच केला. अविनाश ही एक अविनाशी वृत्ती आहे, अविनाश हा कधीच सेवानिवृत्त होऊ शकत नाही. ही अविनाशी वृत्ती आपण आपणा सर्वांच्या मध्ये कशी बाणवता येईल हेच पाहणे आज आवश्यक आहे.

अविनाश, आज तुमच्या स्नेह कार्यक्रमांमध्ये मी सहभागी होऊ शकत नाही परंतु टॅफनॅपच्या सर्व सदस्यांच्यावतीने सेवानिवृत्ती निमित्त तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि इथून पुढेही असेच आपल्या हातून समाजकार्य घडत राहो ही अपेक्षा व्यक्त करतो.

आपला
टॅफनॅपच्या सर्व सदस्यांच्या वतीने प्राध्यापक श्रीधर वैद्य

चांदवड आंदोलनावेळी अविनाश भुतडा सरांच्या पहिल्याच भेटीत त्यांची ओळख करून दिल्यावर मला आता हे हिंदी मिश्रीत मराठीत बोलतील अशा अनुमानाने मी ऐकायला सुरुवात केली . पण पहिल्याच वाक्यापासून इतक्या शुद्ध व साहित्यीक मराठीत बोलायला सुरुवात की मला चळवळीतील कार्यकर्त्याशी बोलतोय की साहित्यिकाशी हे कळेना झाले . माझ्या कोल्हापुरी वाणीत यांचेशी संवाद कसा साधावा यासाठी शब्दांची जुळवाजुळव करू लागलो . जसजसा संवाद वाढत गेला तसे समजले सरांचे वाचनही अफाट आहे . व्यासंगही आहे . याबरोबरच सामाजीक चळवळ ,व्यावसायीक अनुभव व चिरंतन मुल्यांवरील सेवादलाच्या संस्कारातुन आलेला ठामपणाही
सरांच्या शब्दसंग्रहातून प्रकट होतो आहे . सरांशी दहा पंधरा मिनिटे संवाद झाला तरी मन
रिफ्रेश होऊन जाते व कॅशे मेमरीतील निराशावाद पुसला जातो. आम्हाला अपेक्षित होता त्यापेक्षाही प्रदीर्घ असा लढा देऊनही अविनाश भुतडा सरांचा संघटना व त्यांच्या जीवनमूल्यावरील विश्वास ढळला नाही. त्याबरोबरीनेच कौटुंबिक जबाबदारी ही अतिशय समर्थपनणे पार पाडून मुलाला व मुलीला उच्चशिक्षित करून सुसंस्कारीत केले ही गोष्ट वाखाणणीय आहे.

या सर्व लढ्यात आजूबाजुचा परिचित समाज पैशाच्या पाठिमागे लागलेला असताना सिद्धांतवादी व तत्त्ववादी पतीच्या पाठिमागे अनेक प्रकारच्या त्यागाला सामोरे जाऊन ,खंबीर व अविनाशी पाठिंबा देणार्‍या वहिनींचे पण या निमित्ताने विशेष आभार व कौतूक !!🙏🙏
आज चळवळीत राहून आमच्यासह अनेकांना सरांनी प्रेरणा दिली . तशीच त्यांच्या निवृत्तीनंतरही समाजातील तरूण पिढीतून अनेक अविनाश भुतडा त्यांना घडवता यावेत यासाठी त्यांना व त्यांच्या परिवाराला या कामासाठी उत्तम आरोग्य लाभो यासाठी टॅफनॅपच्या वतीने व वैयक्तिक माझ्या हार्दिक शुभेच्छा व प्रार्थना !!
🙏🙏🙏🙏🙏
💐💐💐💐💐
🌹🌹🌹🌹🌹

…. राजेंद्र ढवळे

मित्रांनो…

Payment of Arrears restricted for 3 years prior to filing of the Writ Petition by applying the Limitation Act ह्या संदर्भात काय करता येईल अशी बऱ्याच सदस्यांनी विचारणा केली होती.

ह्या संदर्भातील मा. उच्च न्यायालय, मुंबई यांचा आदेश व ह्या आदेशा विरोधात मॅनेजमेंटने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवरील मा. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल सोबत दिला आहे. I hope this will help all of us to defend the 3 years arrears orders.

Order1
Order2

श्रीधर वैद्य

शुल्क निर्धारण प्राधिकरणाचे अध्यक्ष रिटायर जज्ज विजय अचालिया यांच्याबरोबर संघटनेच्या प्रतिनिधींची बैठक पार पडली.TAFNAP, मुक्ता व सारती संघटनेची प्रमुख मागणी सर्व संस्थांचे फि निर्धारणाचे प्रस्ताव त्यांनी वेबसाईटवर टाकले पाहिजेत याबद्दल कारवाई करण्याचे आश्वासन प्राधिकरणाच्या सर्व सदस्यांनी दिले. आपणा सर्वांच्या सहकार्याने हे यश प्राप्त झाले. शेवटी TAFNAP चे ध्येय वाक्यच आहे Together… We Can.

मित्रांनो…

मंगळवार दि. ९ जुलै २०२४ रोजी शुल्क नियामक प्राधिकरणाचे अध्यक्ष व इतर सदस्य यांचे बरोबर टॅफनॅप, मुक्ता व इतर समविचारी संघटनांच्या सदस्यांची बैठक झाली. ह्या बैठकीनंतर आज जवळपास साडेचार महिन्यांनंतरही शुल्क नियामक प्राधिकरणा कडून कोणतहीही ठोस कृती झाल्याचे दिसून येत नाही.

ह्या संदर्भात आपणां सर्वांशी चर्चा करून ह्या लढ्याची पुढील रूपरेषा ठरविण्यासाठी मंगळवार दि. २६ नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी ७.३० वाजता आपण एक झूम / गुगल मिटिंग आयोजित करीत आहोत. ह्या मिटिंगमध्ये प्रा. राम यादव “भ्रष्टाचार मुक्त, पारदर्शक शिक्षण शुल्क समिती” या राज्यव्यापी आंदोलनाची रूपरेषा स्पष्ट करतील. प्रा. डॉ. सुभाष आठवले सर देखील आपल्याला मार्गदर्शन करतील.

शुल्क नियामक प्राधिकरणाशी संबंधित विभागांशी पत्रव्यवहार व तक्रारी, आझाद मैदान येथे व्यापक आंदोलन, जनहित याचिका, लोकप्रतिनिधी / आमदारां मार्फत ह्या प्रश्नांबाबत विधान सभेत आवाज उठवणे अशा अनेक माध्यमांतून आपण हा लढा पुढे नेणार आहोत. हा लढा यशस्वी करणे ही आपणां सर्वांची नैतिक जबाबदारी आहे.

मंगळवार दि. २६ नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी ७.३० वाजता वाजता आपण ह्या महत्वाच्या झूम / गुगल मिटिंगला हजर रहावे ही विनंती. ह्या मिटिंगची लिंक मी TAFNAP ग्रुपवर टाकत आहे. ह्या ग्रुपवर नसणाऱ्या सदस्यांना देखील आपण ह्या महत्वाच्या मिटिंगबाबत कल्पना द्यावी.

रामने सुरू केलेला हा लढा आपल्याला टोकापर्यंत न्यायचा आहे. तुमच्या सर्वांचे “सक्रिय” सहकार्य अपेक्षित आहे, कारण टॅफनॅपचे ब्रीदवाक्यच आहे “Together… We Can!”

प्रा. श्रीधर वैद्य

Please watch Ram Yadav Sir’s interview regarding FRA here
please Share this link to as many people as possible.

मित्रांनो…

आपल्या राज्य अधिवेशनाची सांगता करून काल कोल्हापूरला परत आलो.

अधिवेशनाचे दोन दिवस हे आपल्या सर्वांकरताच अक्षरश: मंतरलेले दिवस होते. अनेक दिग्गजांचे मार्गदर्शन, विविध विषयांवरची चर्चासत्रे, महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेल्या टॅफनॅपच्या सदस्यांचा एकमेकांशी परिचय, एकमेकांच्या वेदना आणि दिलेले लढे समजावून घेताना मिळालेली एक उभारी, अन्याय आणि भ्रष्टाचारा विरुद्धच्या लढ्यात आपण एकटे नाही तर अख्खा महाराष्ट्र आपल्या सोबत आहे हा मिळालेला विश्वास, परिवर्तनच्या माध्यमातून संघटनेचे प्रबोधनाचे काम, संघटनेच्या वेबसाईटमुळे सर्वांना तत्परतेने उपलब्ध होणारा माहितीचा खजिना ह्या सर्व आपल्या दोन दिवसीय अधिवेशनाच्या उपलब्धी. अधिवेशनाच्या शेवटी आपण एकमताने मंजूर केलेले ठराव आणि आता त्या ठरावांच्या अंमलबजावणीसाठी आखलेला कृती कार्यक्रम आपल्याला आपल्या अंतिम ध्येयापर्यंत घेवून जाणार आहे.

अधिवेशनासाठी जे सदस्य उपस्थित राहिले त्याचे कौतुक आहेच पण जे सदस्य विविध कारणांमुळे येवू शकले नाहीत ह्या सदस्यांचे विशेष आभार. अजूनही टॅफनॅपचे काम कमी पडतेय त्यामुळे अधिवेशनाला न येता घरची तातडीची कामे आपल्या सदस्यांना महत्वाची वाटतात ही माझ्यासाठी आत्मचिंतनाची बाब आहे. तुमच्यामुळे आम्हा सगळ्यांना अधिक काम करायची प्रेरणा मिळाली हे मला नमूद करावेसे वाटते.

अधिवेशन यशस्वी करण्यासाठी झिल इंजिनीयरिंग, पी.सी.पी., तळेगाव आणि एम.एम.पी.च्या सदस्यांनी हे अधिवेशन म्हणजे आपल्या घरचेच कार्य असल्यासारखे समजून घेतलेली मेहनत सर्वांच्याच स्मरणात राहील. सचिन शिंदे, काळे मॅडम, गौरी जाधव, राम यादव, प्रदीप पाटील, राजू गायकवाड, खांडेकर सर आणि त्यांची सर्व टीम, प्रा. दीपक शिरभाते, प्रा. विश्वकर्मा, प्रा. जीवन पाटील, अद्वैत देशमुख, चैतन्य, अक्षय हे सगळे ह्या यशस्वी अधिवेशनाच्या पडद्यामागचे कलाकार. त्यांच्या ऋणातच राहणे आपण पसंद करू.

आपल्यावर होणार अन्याय व तंत्रशिक्षण व्यवस्थेमधील भ्रष्टाचार ह्याचा नेटाने सामना करण्यासाठी आपण हा गोवर्धन पर्वत उचलला आहे. टॅफनॅपच्या प्रत्येक छोट्यामोठ्या सदस्याने हा गोवर्धन पर्वत उचलण्यासाठी योगदान दिलेले आहे. मला खात्री आहे की आपल्या लढ्याचे अंतिम यश हे आपलेच आहे. कारण टॅफनॅपचे ब्रीदवाक्यच आहे “Together… We Can !”